सध्या कामानिमित्त तेलंगना मधील पालमुरु विद्यापीठात (Palamuru University) आहे. या भागातील बहुतांश रहिवासी लोकांना तेलुगू शिवाय अन्य भाषा येत नाहीत. काहींना मोडकी तोडकी हिंदी येते आणि त्यातंच संवाद चालवावा लागतो. तर इथं आल्यापासून कामशिवाय इतर बोलणं जास्त करून कुणाशी होतही नाही. आपल्या राहत्या शहरापासून दूर आणि त्यातही महाराष्ट्र पासून दूर. त्यामुळं मराठीतून बोलणं हे फक्त फोनवरंच घरच्यांशी आणि मित्रांशी. जे सोबत काम करणारे कलीग्स आहेत तेही इकडचेच तेलंगणा किंवा आंध्रप्रदेश. तर त्यांच्याशी संवादही एकतर हिंदी किंवा इंग्रजी. तर सांगण्याचा हेतू एकचं की राहणं-खाणं, भाषा , वातावरण सगळंच एकदम बदलंल आहे.
तर मूळ विषयाकडे येऊ, हे विद्यापीठ आणि महबुबनगर हे जिल्ह्याचं ठिकाण यांच्यामधे "बंदामीडापल्ली"(Bandameedapalli) नावाचं एक छोटंसं गाव आहे. हैदराबाद- रायचूर मार्गावरचं हे गाव. हा मार्ग आणि त्याला जोडणारा गावात जाण्यासाठी रस्ता यांचा मिळुन एक तिठा तयार झाला आहे. या तिठ्यावर हा चित्रात दिसतो तो पुतळा आहे. किमान एका मराठी माणसाला तरी अगदी पहिल्या नजरेत ओळखु येणाऱ्या प्रसंगाचा हा पुतळा.
तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवरायांना "भवानी तलवार" देतानाच्या प्रसंगाचा हा पुतळा. खरं सांगतो हा पुतळा दिसला आणि परदेशात कुणीतरी आपल्या घरचं माणुस भेटल्यासारखा आनंद झाला. त्यातही एक मराठी असल्याचा अभिमान आणि गर्वमिश्रीत आनंद झाला.
नंतर सहकार्यांकडून माहीती घेतल्यावर समजलं की दक्षिणेत शिवरायांना मानणार एक खुप मोठा वर्ग आहे. इथल्या बहुतांश गावात चौकातुन महाराजांचे पुतळे आहेत. शिवजयंती वेळी महाराजांची खुप मोठी रथयात्रा निघते. नंतर "गुगल"बाबा ला विचारलं असता त्यांनी ही👈 लिंक दिली. चलचित्राची भाषा तेलुगू असली तरी काही शब्द कळुन येतात.(कॅप्शन ऑन केल्यास अजुन समजण्यास मदत होईल. महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहीमेचा( श्रीशैलम् , गोवळकोंडा इ.) इतिहास तर सर्वांना माहीत आहे. या दिग्विजयाची ही खुणंच म्हणता येईल.
माझं राहण्याचं ठिकाण याच बंदामीडापल्ली गावातंच आहे, रोज जाण्या-येण्याच्या वाटेवर हा पुतळा लागतो आणि रोज गर्वाने उर भरुन येतो, मन आनंदाने फुलून जातं आणि मस्तक आपोआपच नमस्कारासाठी झुकतं आणि मनात एकंच वाक्य घुमतं "महाराजांची... शिवाजी महाराजांची किर्ती बेफाम होती..."