सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

(डिस्क्लेमर : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्यामुळे अंधश्रध्दा वगैरे मुद्यावर वाद घालु नये. या लेखाद्वारे फक्त समाजामध्ये चर्चिल्या जाणार्या काही गुढ व रहस्यमयी विषयासंबंधी लिहले  त्या विषयांमध्ये कुणी किती खोल जायचे व कुणी किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.  अंधश्रध्दा वगैरे विषयांवर वादविवाद करणार्यांनी स्वत:च्या जबाबदारीवरती हा लेख वाचणे.)
                         कुतुहल, मनुष्याला लाभलेल्या अमुल्य देणग्यां मधिल एक. या कुतुहलाने आजवर अनेक नवनविन शोधांना जन्म दिला. असं म्हट्ल जात कि गरज हि शोधाचि जननी आहे, पण मी अस म्हणेण कि कुतुहल हेच खरेतर शोधाचं कारण आहे किंवा असंही म्हणता येईल की, एखाद्या गोष्टीची गरज भासणे व त्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नाच्या परिणामांच्या कुतुहलातूनच नवीन शोधांचा जन्म होत असावा असो. अनेक प्रकारच्या कुतुहलाबरोबरच अगदी अनादि काळापासून मनुष्याला भविष्याविषयी कुतूहल आहे. भविष्याची ती अज्ञात दिशा त्याला नेहमी खुणावत आली आहे. प्रत्येक संस्कृतीतील व्यक्तिला भलेही ती आस्तिक असो अथवा नास्तिक प्रत्येकाला भविष्य जाणून घेण्याची ईच्छा आहे. आणि तो आपआपल्या परीने ते जाणून घेण्या विषयी प्रयत्न करत आला आहे. यासाठी कुणी कुंडली मांडतं, कुणी एखाद्या देव-देवर्षि यांच्या पाठी लागत, तर कुणी हाताच्या रेषा पाहतं, एकूण काय तर  या व इतर अनेक माध्यमातून मानव आपली जिज्ञासा शमविण्याचा प्रयत्न करत आला आहे. अलीकडे तर संमोहनाद्वारे गतायुष्य व भविष्य जाणून घेण्याच्या प्रयत्नाविषयी ऐकण्यात व वाचण्यात येत आहे. माणसाच्या या कुतुहलाने विविध शास्त्रांना जन्म दिला. जसे की फलज्योतिष, सामुद्रिक शास्त्र, रमल विद्या,टँरोट कार्ड इ. आणि यापैकीच एक आहे शकुन.
                   मुळात शकुन म्हणजे काय? तर शकुन म्हणजे एखादा संकेत जो तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या  एखाद्या घटनेविषयी पूर्वसूचना देतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ,संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग सर्वांना माहीत असावा.
 पैल तो गे काउ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे  
 म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी जर एखादा कावळा घरासमोर येऊन ओरडू लागला तर तो एखादा पाहुणा घरी येण्याचा संकेत समजला जाई. अशाप्रकारे पक्षांच्या, प्राण्यांच्या आवाजावरुन, कृतीतून वेगवेगळे शकुन ठरवले जात. आजच्या आधुनिक शास्त्रानेही ही गोष्ट मान्य केली आहे की भविष्यात येणार्या आपत्ति विषयी प्राण्यांना अगोदरच कल्पना येते. मागच्या काळात आलेल्या काही नैसर्गिक आपत्तीतील अनुभवांविषयी प्रत्येकाला ऐकून, वाचून अथवा पाहून माहिती असेलच, त्यामुळे ते सांगण्याची गरज नसावी. तर आपल्या पूर्वजांनी अशा प्रकारच्या संकेतातून भविष्यविषयक घटना जाणून घेण्याविषयी अनेक मार्ग शोधले. अनुभावातून ते आणखी प्रभावी होत गेले. ते वेगवेगळ्या ग्रंथात नमूद केले. काही गोष्टी पिढ्यांपिढ्या जपल्या गेल्या, आत्मसात केल्या गेल्या,नंतर त्या कुणीतरी लिहून ठेवल्या, जतन केल्या. आणि यातीलच एक म्हणजे सहदेव-भाडळी
            प्रत्येक संस्कृतीमध्ये शकुंनांना महत्व दिले गेले आहे. एखाद्या अगदी क्षुल्लक वाटणार्या घटनेतून आपल्याला भविष्यातील घटनेचा व त्याच्या  परिणामांचा बोध होतो तोच शकुन होय. जसं की , एखाद्या वेळी कुठलीतरी घटना घडण्या अगोदर आपल्याला अंतर्मनातून  काहीतरी जाणवतं व नंतर ती घडून गेल्यानंतर आपण म्हणतो की मला हे अगोदरच जाणवलं होत. एकूण काय तर आपलं अंतर्मन आपल्याला काही गोष्टींची पुर्वसुचना देतं. अगदी त्याच प्रमाणे निसर्ग सुदधा आपल्याला काही पुर्वसुचना देत असतो आणि ते म्हणजेच शकुन.
                                या ग्रंथात काय आहे हे तर आपण जाणून घेऊच परंतु त्याआधी सहदेव-भाडळी म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ. सहदेव व भाडळी हे दोघेजण सावत्र भाऊ-बहीण. त्यांची कथा अशी की,( ही कथा अरविंद सहस्त्रबुद्धे यांनी संपादित केलेल्या आवृत्तीत आहे.) सुमारे 700-750 वर्षापूर्वी पैठण येथे मार्तंड जोशी नावाचे ब्राम्हण राहत होते. त्यांची ही दोन मुले. सहदेव हा त्यांचा ब्राम्हण पुत्र तर भाडळी ही एका अंत्यज स्त्रीपासून झालेली मुलगी. लहानपणी सहदेव आपल्या वडिलांकडून ज्योतिष विद्या शिकत होता. तो शिकत असतानच त्याचे वडील एकाएकी वारले आणि त्याची विद्यासाधना अपुरी राहिली. म्हणून सहदेवाने गुरु शोधण्याचे ठरवले. पैठण नगरातच एक साधूपुरुष राहत होते सहदेव त्यांचेकडे गेला व त्याने त्यांना शिष्य करून घेण्याची व त्रिलोकज्ञान विद्या प्रदान करण्याची विनंती केली. त्यावेळी त्या साधूपुरुषांनी त्याला संगितले की तुला जी त्रिलोकज्ञान विद्या  हवी आहे ती  मलाही अवगत नाही. पण सहदेवाने हट्ट सोडला नाही. तेव्हा त्यांनी संगितले की या गावात अनेक समाध्या आहेत त्यात एका लिंबाच्या झाडाखाली माझ्या गुरुची समाधी आहे. तू ती समाधी शोधून, उकरून त्यातील माझ्या गुरुची कवटी काढ आणि रोज सकाळी नदीवर स्नान वगैरे उरकून, ती कवटी उगलून पित जा. त्यायोगे तुला त्रिलोकज्ञान विद्या प्राप्त होईल. त्यांनी सांगितल्या प्रमाणे सहदेव रोज सकाळी ती कवटी थोडी-थोडी उगाळून पिऊ लागला. एके दिवशी योगायोगाने भाडळीने हे पाहिले. तिच्या लक्षात सर्व प्रकार आला की, सहदेवाला ज्ञान कसे प्राप्त होत आहे ते. सहदेव निघून गेल्यानंतर तिने सर्व कवटी एकादाच उगाळली व पिऊन टाकली. त्यामुळे तिला त्रिलोकज्ञान प्राप्त झाले.  दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे सहदेव आपले नित्य कर्म उरकून कवटी ठेवलेल्या जागी गेला. पण त्याला कवटी सापडली नाही. तो पुन्हा त्या साधूपुरुषाकडे गेला व त्यांना कवटी नाहीशी झाल्याचे सांगितले. त्यांनी अंतर्ज्ञानाने सर्व जाणले व सहदेवास सांगितले की, तुझ्या प्रारब्धात होते तेवढे तुला मिळाले, व भाडळीला ती कवटी मिळाली व तिने ती सर्व एकाचवेळी पिऊन टाकली, त्या कवटीचा जास्त अंश तिच्या पोटात गेल्याने तिला सर्व विद्या प्राप्त झाली आहे. वरती असेही सांगितले की आता जर तुला ज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर उच्च-नीच, जात-पात विसर व तिचा शिष्य हो. सहदेवानेही तसेच केले. त्या दोघांमध्ये शास्त्रविषयक जी चर्चा झाली, तोच हा सहदेव-भाडळी ग्रंथ होय. ( यापेक्षा जराशी वेगळी कथा विकिपीडिया वरती आहे अवश्य वाचावी.)
                                  या कथेच्या सत्यासत्यतेत पडण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. कारण या ग्रंथात जी माहिती आहे ती त्याहीपूर्वीच्या पौराणिक ग्रंथांचा अभ्यास करून व अनुभवातून मांडलेली आहे. याला प्रमाण या ग्रंथाच्या मेघमाला विभागात पुढील ओळी आहेत,

  श्रीशंकर बोलीले  भवानीने ऐकिले
ते मृत्युलोकी आणिले  श्री व्यासांनी
ते होते संस्कृत  भाडळीने केले प्राकृत
सहदेवे ऐकिले निश्चित  उमजला मनी "

                              अर्थात असं की संस्कृतात असलेलं ज्ञान भाडळीने प्राकृत भाषेत आणून सामान्य जनांसाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे ही कथा रूपकात्मक समजली तरी हरकत नाही. त्यामुळे ना कथेच अलौकिकत्व कमी होत ना या ग्रंथाचं.  सहदेव-भाडळीची ही शास्त्रचर्चा पुढे कालांतराने शाहीर हैबतीबुवा यांनी काव्यात गुंफली जी आज सहदेव-भाडळी या ग्रंथरूपाने आपल्याला उपलब्ध आहे. या ग्रंथाशी माझा संबंध लहानपणीच आला. या ग्रंथाची अरविंद सहस्त्रबुद्धे यांनी संपादित केलेली एक आवृत्ती आमच्या घरी होती. मला या प्रकारच्या शास्त्रांत आवड होती की या ग्रंथामुळे ती निर्माण झाली हे मी सांगू शकत नाही. कारण विषयातील माझ्या परिचयात आलेलं पहिलं पुस्तक म्हणजे सहदेव-भाडळी. त्यानंतर अशा विषयातील अनेक पुस्तकात वाचनात आली, असो. कालांतराने मला घरात या ग्रंथाची अजून एक आवृत्ती सापडली जी खूप जुनी होती. पाने अगदीच जीर्ण झाली होती. सुरवातीची व शेवटची आणि कदाचित मधलीही काही पाने गहाळ झाली होती. कोपरे पार उडाले होते. पाने तर एवढी जीर्ण आहेत की थोडी जोरात पलटली तरी फाटतील. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि त्याच वाईटही वाटलं की या आवृत्तीत जेवढी विस्तृत माहिती दिली होती त्यापेशा खूपच संक्षिप्त माहिती नवीन आवृत्तीत होती. बहुतांश खूप काव्ये नव्या आवृत्तीत वगळली आहेत.
                                 हा ग्रंथ पुढे अनेक प्रकाशकांनी संपादित केला. त्यामुळे प्रत्येक आवृत्तीत थोडाफार फरक असू शकतो. पुढील माहिती ही अरविंद सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेल्या आवृत्ती प्रमाणे आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या ग्रंथात ३२ विभाग आहेत. आताच्या नवीन आवृत्तीत ४० विभाग आहेत व त्याबरोबरच अवकहाडा चक्र, घात चक्र, गोत्रावळी, हे जादाचे विभाग आहेत. त्यावरूनच पुढील माहिती देत आहे.
     पहिल्या विभागात सहदेव भाडळीची कथा आहे. दुसरा विभाग पंचांग विषयक आहे. ज्यामधे तिथी,वार, नक्षत्र, योग करण यांची माहिती आहे. पुढील विभाग शक विषयक माहिती देतो. यात शालिवाहन शक, विक्रम संवत, सौरवर्ष, अयणे, अक्षांश-रेखांश यांची माहिती आहे. चौथा विभागात ग्रह व त्यांच्या राशी व त्यासंबंधी इतर माहिती आहे. यातच साठ संवत्सरांची नावे व त्याची माहिती आहे. पाचवा विभाग शिवलिखित पाहावयाचे कोष्टक हा आहे. ज्यायोगे दिवसभरातील शुभाशुभ योग समजतात. सहाव्या विभागात जन्ममहिना व त्याचे फळ सांगितले आहे. पुढच्या विभागात नक्षत्रांची गुणवैशिष्टे सांगितली आहेत. आठवा विभाग नक्षत्र व मानवी स्वभाव याची माहिती देतो. पुढील विभाग नक्षत्रावरून पिडादिवस, त्याच्या शमणार्थ उपाय, जन्मानक्षत्रावरून नाव, रास पाहणे, राशीवरून घातवार, घातनक्षत्र, घाततिथी यांची माहिती आहे. दहाव्या विभागात बारा राशी व शरीरातील अवयव यांचा संबंध यांची माहिती आहे. हे दहा विभाग नवीन ज्योतीष शिकणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहेत.
                           अकरावा भाग हा प्रयाण-विचार या नावाचा आहे.  यामध्ये प्रवासासंबंधी शुभाशुभ शकुनांची माहिती दिली आहे. त्याच बरोबर प्रयाणास शुभाशुभ तिथी, नक्षत्र वार, प्रहर यांची माहिती आहे. बारावा विभाग खुपच संक्षिप्त आहे. त्याचे नाव आहे प्रस्थान ठेवण्यास यात आपत्कालीन वेळी म्हणजे मुहूर्त पाहणे शक्य न झाल्यास करावयाचे नियम सांगितले आहेत. तेरावा विभाग आहे गर्भावळी. हे एकशे चोवीस ओव्यांचे एक काव्य आहे. यामध्ये गर्भलक्षण सांगितली आहेत. नऊ महिन्यातील गर्भाचा होणारा विकास कसा होतो हे संगितले आहे. एकदा अवश्य वाचावा. पुढचे दोन विभाग लग्नविचाराचे आहेत. यामध्ये विवाहमुहूर्त, त्यास योग्य व त्याज्य नक्षत्रे यांची माहिती आहे. सोळावा विभाग ऋतुफल व गर्भदान मुहूर्त यांसाठी आहे. सतरावा विभाग हिंदू धर्मातील संस्कार व त्यांचे मुहूर्त यासंबंधी आहे. अठरावा व एकोणविसावा विभाग आहे प्रश्नविचार". यामध्ये अंकगणितावरून प्रश्नांची उत्तरे जाणण्याची माहिती आहे.
  पुढचा विभाग आहे अंगस्फुरणाची फले व शकुनविचार आहे. कधीकधी आपले काही अवयव फडफडल्याचं जाणवतं उदा. डोळ्यांची पापणी फडफडणे. शरीरशास्त्रात वा वैद्यकशास्त्र यांत याची कारणे वेगवेगळी असतीलही , परंतु या अंग स्फुरणाच्या लक्षणावरून भविष्यातील शुभाशुभ घटनांची माहिती मिळते हा विचार आपल्या संस्कृतीत खूप पूर्वीपासून आहे   आणि त्याचाच विचार   या विभागात केला  आहे. 
                       पुढील विभाग स्वप्नविचार. अस म्हटलं जात की मनी वसे ते स्वप्नी दिसे". झोपताना आपल्या मनात जे विचार चालू असतात किंवा दिवसभरात जर एखाद्या गोष्टीविषयी आपण जास्त विचार करत असलो तर त्यांचे पडसाद  निद्रावस्थेत चित्र-विचित्र स्वप्नाच्या रूपाने प्रकट होतात. परंतु अशी स्वप्ने झोप चाळवतात आणि जाग आल्यानंतर ही स्वप्ने आपल्याला सहसा आठवत नाहीत. अशी स्वप्ने ही मनाचा खेळ समजली जातात. परंतु ज्यावेळी आपले मन शांत असेल व गाढ झोपेत एखाद्या समयी काही स्वप्ने पडतात व जाग आल्यानंतरही ही ती स्वप्ने लक्षात राहतात ती सूचक स्वप्ने समजली जातात. ही स्वप्ने आपल्या नजीकच्या भविष्यातील काही घटना वा एखाद्या कार्याच्या पूर्ततेविषयी सूचना देत असतात. त्यांचा विचार या विभागात केला आहे.
                       त्यापुढील विभागात पल्लीपतन, सरडारोहन यांची अवयवानुसार व प्रहरानुसार फले सांगितली आहेत. त्याचबरोबर होला (पक्ष्याचे नाव) शकुन फल, श्वान(कुत्रा) शब्द शकुन फल, काक (कावळा) शब्द शकुन फल व पिंगळा (पक्ष्याचे नाव) शब्द शकुन फल हे विभाग आहेत. यामध्ये वरील प्राणी व पक्षी यांचा आवाज, दिशा, प्रहर यावरून शकुन सांगितले आहेत.
      पुढील विभाग आहे मेघमाला, म्हणजेच पर्जन्यविचार. हा खरेतर या ग्रंथाचा मुळ गाभा म्हणावा लागेल. यामध्ये मेघलक्षन, महिन्यांवरून व नक्षत्र, ग्रह यांच्या नुसार पावसाचे भविष्य वर्तवले आहे. या मध्ये एक गोष्ट जाणवते  की भाडळीने यात ज्योतिष शास्त्रापेक्षाही हवामानाच्या अंदाजावरून पर्जन्यविचार केला आहे. जसे की, एखाद्या ठराविक महिन्यात किंवा ठराविक नक्षत्रातील मेघलक्षण व वार्याची दिशा व वातावरणातील अजून काही बदल यावरून भविष्यातील पावसाचे अंदाज सांगितले आहे. पूर्वी जेव्हा आधुनिक हवामान यंत्र उपलब्ध नव्हती तेव्हा जुनी-जाणती लोक आहेत ते अशाच प्रकारे पावसाचे अंदाज बांधत आणि ते तंतोतंत खरेही होत. आज सुसज्ज हवामान शाळा आहेत परंतु त्या हवामानविषयी म्हणावी अशी योग्य माहिती देवू शकत नाहीत.  
             पुढील विभागात विहीर, कूपनलिका यांच्यासाठी भूगर्भातील पाण्याचे झरे व त्यांचे स्थान जाणण्याचे शास्त्र आहे.  नंतरचा विभाग आहे वास्तुविज्ञान यामध्ये घर बांधण्याचे मुहूर्त, वास्तु बांधताना साधावयाचा आया याची माहिती आहे. पुढे गाय, बैल, कुत्रा, घोडा, कोंबडा या पाळीव प्राण्यांची पारख करण्याची लक्षणे सांगितली आहेत. पुढचा विभाग आहे कृषिकर्म विचार. यामध्ये शेतीविषयक कामाच्या मुहूर्तांची माहिती आहे, जसे की पेरणी,कापणी, मळणी इ. पुढे अनिष्ट ग्रहांचे उपाय सांगितले आहेत.
    त्यापुढील विभाग आहे यंत्रशास्त्र. हिंदू  आणि त्याबरोबरच जैन व बौद्ध संस्कृतीत तांत्रिक उपासनेत यंत्र शास्त्राला खूप पूर्वीपासून महत्व आहे. यंत्र म्हणजे काही बीजाक्षरे व अंकांचा वापर करून तयार केलेली एक साचेबद्ध आकृती. ही यंत्रे म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरस्वरूप मानली जातात. विशिष्ट देवतांची विशिष्ट यंत्र असतात उदा. "श्रीयंत्र" सर्वांना माहीत आहे जे श्रीलक्ष्मी पूजनात वापरले जाते. त्याच बरोबर एखाद्या विशिष्ट कार्यासाठी सुद्धा विशिष्ट यंत्र तयार केले जाते. यंत्र तयार करण्याचे व ते सिद्ध करण्याचीही एक विशिष्ट विधी असते. ज्यायोगे यंत्रांमधे त्या देवतेच आवाहन केले जाते. तर या ग्रंथामध्ये फक्त काही जी सामान्य लोकांना उपयोगी पडतील अशीच यंत्रे दिली आहेत.
             अशा प्रकारे जुन्या आवृत्तीत बत्तीस विभाग आहेत. नवीन आवृतीत मासाप्रमाणे भविष्यफल, शरीरलक्षणावरून भविष्य, शिंकेचे शुभाशुभ फल, रुद्राक्ष माहात्म्य, घरगुती आरोग्यविषयक औषधे, पत्रिकेवरून अवयव बोध, साडेसाती विचार, हे आठ विभाग मिळून चाळीस विभाग आहेत.
                                        तर असा हा ग्रंथ शेतकर्यांसाठी तर खूपच उपयोगी आहे परंतु त्याबरोबरच कामगार, व्यापारी, ज्योतिष आणि सामान्य लोक यांच्यासाठीही उपयुक्त आहे. या ग्रंथाविषयी अनेकांच्या मनात खूप गैरसमज आहेत. त्यासाठीच हा लेखनप्रपंच. काहीजण याचे मुखपृष्ठ पाहून हे एखाद्या तांत्रिक साधनेचे पुस्तक समजतात पण असे काही नाही. मुळात यंत्र विभाग सोडला तर याचा अशा साधनेशी काहीच संबंध नाही आणि त्यातही फक्त साधारण यंत्रे आहेत जी शेतकरी, व्यापारी यांना उपयोगी आहेत. यातील बहुतेक भाग हा शकुनविचाराचाच आहे. आताच्या  पिढीतील अनेकांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली या प्रकारच्या अनुभावातून उदयाला आलेल्या शास्त्रांना जाणून घेण्यात रुचि ठेवली नाही. अनेक जुन्या-जाणत्या लोंकांबरोबर कितीतरी अमूल्य गोष्टी इतिहास जमा झाल्या. प्रदीर्घ काळाच्या अनुभवातून व अभ्यासातून त्यांनी हे ज्ञान संपादित  केलं जे जतन होणे खूप गरजेचं आहे. आज ज्यावेळी आपण कुठल्याही ठिकाणी कामासाठी जातो तिथं वयाला नाही तर अनुभवाला प्राधान्य दिलं जातं. मग ही अनुभावातून निर्माण केलेली शास्त्र आपण काहीही जाणून न घेता धुडकाऊन का लावतो? जे अद्भुत तर आहेच पंरतू अलौकिक व अमूल्य आहे आणि मुळात मानवाच्या अफाट अनुभावातून जन्माला आलेली आहेत, हे काहीही म्हटलं तरी हे कुणीच नाकारू शकत नाही. एकवेळ यांत्रिक साधन वा उपकरण चुक करू  शकतं कारण त्याला काही मर्यादा आहेत पण निसर्ग कधी चुकत नाही. त्याच काम अव्याहत चालू आहे. कदाचित बदलत्या परिस्थितीनुसार काही नियम काही संकेत रद्दबादल झाले असतीलही, तर ते नव्याने अभ्यास करून ते अद्ययावत करावे लागतील. बदलत्या काळानुसार साधनेही बदलली असली पण त्यामुळे जुन्याला कमी लेखुन चालत नाही. कारण आयत्यावेळी तेच उपयोगी येत.
                             यात अजून एक महत्वाची गोष्ट जी आख्यानातून समजते ती म्हणजे सहदेव-भाडळी हे मूळचे महाराष्ट्रातीलच. त्यामुळे त्यांची निरीक्षणे ही इथलीच. त्या कारणाने त्यांचे पर्जन्य वा इतर संदर्भातील शकुन हे इथे जास्त लागू होतील. जरी आज आपल्याकडे नवनवीन उपकरणे उपलब्ध असली तरी हे स्वतः निसर्गाकडून मिळणारे संकेत जास्त ठळक असु शकतात. त्यामुळे यांचा अजून अभ्यास होणं गरजेचं आहे आणि हे अपूर्व ज्ञानाचं हे कुंड सदैव धगधगतं ठेवावं लागणार आहे.शकुनांचा हा वारसा काळाच्या ओघात लुप्त होण्यापासून जपावा लागणार आहे.
धन्यवाद.
         
-प्रदिप काळे (मुक्त कलंदर©)
  पंढरपुर
सहदेव भाडळी ग्रंथ मुखपृष्ठ                                  सहदेव भाडळी ग्रंथ  पहिले पान 



 हे सुद्धा अवश्य वाचा -  निळावंती : एक न उलगडलेले रहस्य
__________________________________________________________

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


                                
    
        

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप

'थोडंसं विषयाबद्दल '
            आजकाल सोशल मिडियाचा वापर खुपचं वाढला आहे. आपण तासन् तास त्यांच्या सोबत आहे. उठता-बसता, चालता-बोलता,खाता-पीता प्रत्येक ठिकाणी आता यांचच राज्य. जरी सोशल मिडियाने दुरस्थ संवादाला नवीन दिशा दिली असली तरी आपले वारू मात्र भरकटत चालले आहेत किंवा ते भलतीकडेच उधळत आहेत. या माध्यमांचा  दुरुपयोग वाढत चालला आहे.आज यांच्या मार्फत अनेक गुन्हे घडत आहेत. उदाहरणे अजुन ताजी आहेत.
              खरंतर आपल्याला  या गोष्टींचा वेळीच विचार करावा लागणार आहे की आपण यांच्या किती आहारी जायचं. या माध्यमांचा वापर किती व कसा करायचा हे शेवटी वापरकर्त्यालाच ठरवायचे आहे. शेवटी हि सारी माध्यमेच आहेत त्यांना आपण जसे वापरू तसेच ते वागणार आहेत.म्हणुनच या सोशल मीडिया'चा वापर दोघांनाही (माध्यम आणि वापरकर्ता ) 'सोसेल' एवढाच असावा. 
याच विषयावर ही पुढची कविता. यात जरी फक्त दोघांचा(फेसबुक आणि व्हॉट्सअॅप) उल्लेख असला तरी त्या बरोबर बाकीची माध्यमेही आलीच.
____________________________________________________________________

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ने अवघं आयुष्य बदलुन टाकलं
थोडंसं सुखद, सुसह्य; पण भलतंच अवघड केलं

दुरस्थ संवादाचा मार्ग जरी अजुन जवळ केला
आपुलकीचा ओलावा मात्र  मधेच कुठेतरी उडून गेला

भावनांची जागा "Feeling" ने घेतली, (सु)विचारांची जागा "Status" ने
हसतोही आम्ही "Smilies😂" ने , अन् रडतोही आता "emojis😢" ने

बाकी काही असो, अफवांचं पिक मात्र इथं जोमाने पिकतं
कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्ड च्या खताने क्षणाक्षणाला फुलतं

देवाच्या नावे धमक्यांचा तर रोजचा इथे दरारा
देवालाही ठाऊक नसेल, तो तरी काय करणार म्हणा बिचारा

साहित्य चोरांची तर भलतीच चंगळ आहे
लेखन एकाचं, माध्यम हे , अन् वाहवा! मात्र त्यांची आहे

आता या साऱ्याला  हे दोघेच जबाबदार कसे
यांच्या जोडीने Insta आलं, Tweeter आलं, बाकी सारे ही आले

सगळे कसे पहा एका माळेचेच मणी
पण ही दोन रत्नं मात्र Famous खरी

शेवटी काय हो, एकाच बापाची दोन्ही लेकरं
असेना का, एक स्वत:चं(FB) आणि एक दत्तकपुत्र(WA)

पण काही म्हणा झुकेशराव, तुमच्या लेकरांनी मात्र नाव काढले
बाकी सर्वांना मागं टाकुन, ते पुढे पुढेच राहीले

भलतंच वेड दिलंस तु आम्हा, आता काही सुटका नाही
वरचं सारं कळत असुनही, आता काही वळत नाही

अखेर ही सारी माध्यमच, चालक इथे दुसराच आहे
तो वापरेल तसं, चालवेल तसंच वागणं यांना भाग आहे

आता माझी ही कविता (त्यांच्यावरचीच) , मी त्यांच्याच हाती सोपवत आहे
पाहु पुढे काय होतं, शेवटी आपल्या हाती तेवढंच आहे
________________________________________
- मुक्त कलंदर© (प्रदिप काळे)
_______________________________________________________
©"All Rights reserved"
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.



पाताळ यात्रा, ले.- अनिल ज.पाटील (कादंबरी अभिप्राय)

प्रत्येकाने वाचावे अशीच ही कादंबरी, श्री. वर्तकांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे इतर विज्ञान वा विलक्षण कादंबर्‍या सारखे फक्त कल्पनविलास नसूण त्यास सध्याचे विज्ञान व प्राचीन इतिहास यांचा आधार आहे. जो इतिहास आज आपल्याकडे केवळ दंतकथा मानला जातो व फक्त वेद व पुराणे यातच बंद आहे आणि ते जाणण्याचे कष्ट कुणीच घेत नाही. अनिल पाटील यांनी मूलभूत संशोधन ग्रंथांचा अभ्यास करून ठिकठिकाणी त्यांचे संदर्भही दिले आहेत.
आज अनेक ठिकाणांच्या संशोधनातून रामायण ,महाभारत यांचे पुरावे सापडत आहेत यांमुळे या दंतकथा,वा कल्पनाविलास नसून यात काहीतरी तथ्य आहे स्पष्ट आहे.
लेखकांनी कादंबरीच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची सूची दिली आहे, त्याच बरोबर इंका सभ्यतेतील शब्दांचे संस्कृत व इतर भारतीय भाषेशी साम्य असलेली शब्दसूची दिली आहे. त्याबरोबरच कादंबरीत उल्लेख आलेल्या काही संदर्भाचे फोटोही दिले आहेत.
पौराणिक ग्रंथात उल्लेख असलेल्या "पाताळ लोक " या संकल्पनेवर आधारित कादंबरी आहे. पण त्याबरोबरच भारतवर्ष व दक्षिण अमेरिका यांचा प्राचीन संबंध याचीही माहिती आहे. त्याप्रमाणेच खंडांची पौराणिक ग्रंथात आढळणारी नावे व आताची नावे, अजून काही प्रदेशांची वेद व पौराणिक ग्रंथामध्ये आढळणार्‍या नावांचा व त्यांच्या आताच्या नावांचा संबंध सांगितला आहे.  माया संस्कृती ,इंका संस्कृती, मयासुर, बळीराजा व प्राचीन भारतीय संस्कृती यांचाही संबंध सांगितला आहे.काही ठिकाणी थोडंसं अतिशयोक्ती वाटेल बाकी वाचल्या नंतर कळेलच.
अनिल पाटील यांनी त्यांना पौराणिक ग्रंथातील गवसलेला हा अतिप्राचीन इतिहास कादंबरीच्या स्वरुपात थोडासा रंजक पद्धतीत सांगितला आहे.
त्यामुळे प्रत्येकाने विशेषतः या विषयात आवड असणार्‍यांनी तर एकदा अवश्य वाचावी अशीच ही कादंबरी आहे. बाकींनी एक रंजक व विलक्षण कथा म्हणुन वाचण्यास काहीच हरकत नाही.


-मुक्त कलंदर

_______________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

रावतेंचा पछाडलेला वाडा.-ले. नारायण धारप व डॉ.अरुण मांडे.( अभिप्राय)



            मागे काही दिवसापूर्वी “Narayan Dharap- नारायण धारप  या नावाने नारायण धारप यांच्या चाहत्यांच्या फेसबूक पेजवर ही कथा वाचण्यास मिळाली. हे परीक्षण वगैरे नसून वाचक या नात्याने हा माझा या कथेविषयीचा अभिप्राय आहे. लेखकांनी लिहावं,परीक्षकांनी परीक्षण करावं तर वाचकाने त्या कथेचा वा साहित्याचा आस्वाद घ्यावा व त्या साहित्य प्रवासातील आपला अनुभव अभिप्राय स्वरुपात द्यावा अस मला वाटतं.
          आपल्या इथे भयकथा,गूढकथा,विज्ञानकथा,रहस्यकथा यांचा वाचकवर्ग म्हणावं तसा नाही आणि लेखक वर्गही कमीच. अलीकडे अनेक हिन्दी चित्रपटांमधून हा भयकथांचा विषय हाताळण्यात येतोय पण त्यातही मूळ कथानकापेक्षाही शृंगारीक प्रसंगावरच जास्त भर दिला जातो व याचच वाईट वाटतं. आणि काही दाक्षिणात्य चित्रपटातूनही हे विषय चांगले हाताळले गेले पण अलीकडे त्यांनीही भयपटाचे विनोदपट करून ठेवले. हॉलीवूडने मात्र या विषयात काही खूपचं अप्रतिम चित्रपट दिले जस की द कंजूरिंग सिरिज,द रिंग सिरिज, द एक्सोरसिस्ट सिरिज, इन्सीडुअस सिरिज किंवा मग अलीकडेच आलेला “it”. अजूनही भरपूर नावे सांगता येतील. त्याबरोबरच बाकी विषयातही त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. तिकडे या प्रकारचं लेखनही भरपूर झालं आणि वाचकवर्ग ही भरपूर आहे.  
          आपल्याकडे या लेखनाची कसर नारायण धारप,रत्नाकर मतकरी इ. दिग्गज लेखकांनी भरून काढली.अलीकडच्या आणि कदाचित आमच्याही पिढीला नारायण धारप हे नाव नवीनच असेल पण एक काळ त्यांनी आपल्या लेखनाने गाजवला होता. धारपांचा वाचकवर्गही मोठा आहे. धारपांच्या लेखणीच वैशिष्ठ्य म्हणजे, ते पात्र, स्थळ यांच्या वर्णनातून प्रसंग प्रत्यक्षं समोर उभा करत आणि एखाद्या भयप्रसंगाच्या वर्णनात कुठेही किळसवाणे वाटणारे वर्णन नसे पण तरीही तो प्रसंग तेवढाच परिणामकारक असे. आणि त्यांच्या कथांचा शेवट हा नेहमी सकारात्मक असे. दुष्टावर सुष्टाचा विजय, वाईटवर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय. आपल्याला नेहमी हॅप्पी एंडिंग ची आशा असते आणि तेच त्यांच्या कथांमध्ये असे.               
              आता या कथेबद्दल, ही धारपांची अपूर्ण राहिलेली कथा. नंतर डॉ. अरुण मांडे सरांनी ही पूर्ण केली, आणि “Narayan Dharap-नारायण धारप” या फेसबूकपेजवर पूर्वपरवानगीने ही कथा प्रकाशित करण्यात आली.एक भयकथा,गुढकथा व रहस्यकथा प्रेमी व त्यातही धारप प्रेमी त्यामुळे नारायण धारपांच्या जितक्या मिळतील तितक्या कथा वाचवयास मिळणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट कुठली असेल.
              डॉ. अरुण मांडे सरांनी हे शिवधनुष्य अगदी सहज पेललं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे  या धनुष्याला प्रत्यंचा लावताना धनुष्य भंग न पावता प्रत्यंचाही अलगद बसवला. म्हणजेच कथेची लय कुठेही बिघडू न देता व धारप सरांच्या शैलीला कुठेही धक्का न लावता ही कथा पूर्ण केली. कुठल्याही दोन गोष्टींमध्ये तुलना करणे हा मानवी स्वभावच आहे. आपल्याही नकळत आपण आपण ती करू लागतो, पण खरेतर इथे ही कथा दोन लेखकांनी लिहल्यासारखे वाटतच नाही.मांडे सरांनी कथेला अगदी योग्य न्याय दिला आहे.
             आता धारप सरांच्या मनात या कथेचा काय प्लॉट होता हे कदाचित सांगता येणार नाही.पण मांडे सरांनी जो प्लॉट devlope केला आहे तोही खूपच उत्कृष्ट आणि धारप शैलीला साजेशा आहे. ही कथा मोजक्याच पात्रात रेखाटली आहे. ती कुठल्याही एका पात्राभोवती घुटमळत नाही तर प्रत्येक पात्राची आपली एक वेगळी ओळख आहे अगदी लहानग्या पारू म्हात्रेचीहि.
           या कथेतील वाड्याचे वर्णन मात्र अगदी उत्तम केले आहे. अगदी प्रत्यक्ष वाडा डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याबरोबरच कथेतील पात्रांची इतर स्थळांची वर्णनेही बारीकतेने केली. इतर पात्राप्रमाणे वाड्यातील दुष्ट शक्तींच्या वास्तव्यामुळ वाडा ही एक पात्रच बनला आहे. वाड्यातील त्या शक्तीचा इतिहासही कुठेही अवास्तव न दाखवता अगदी मोजका पाहिजे तेवढाच सांगितला आहे. तसे पहिलं तर या कथेत शेवट सोडला तर मोजक्याच अमानवीय घटना घडल्या पण त्याही कथेवर छाप पाडणार्‍या व लक्षात राहतील अशाच आहेत. कथा कुठेही जास्त ताणून न धरता एकाच लयीत पूर्ण केली आहे आणि गतीही कुठे कमी वा जास्त होत नाही. इतर धारप कथेप्रमाणे या कथेचा शेवटही सकारात्मक झाला आहे हे विशेष. हे सगळे पाहता ही कथा अगदी उत्तम जमून आली आहे. बाकी जास्त काही लिहीत नाही कारण स्वतः कथा वाचण्याचा अनुभव हाही निराळाच असतो आणि तोच प्रत्येक वाचकाने घ्यावा.त्यामुळे वाचावीच अशी कथा आहे. शेवटी काय प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा भाग.

-मुक्त कलंदर(प्रदिप काळे). 
____________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

एकांत-संध्येच्या छटा

मावळतीकडे झुकलेला दिनकर
त्याची लाली स्वत:मधे मिसळणारा अथांग जलधी,
एका पाठोपाठ एका लयीत धावणार्या त्याच्या लाटा,
त्यांच्याशी पाठशीवण खेळणारा किनारा,
त्या किनार्यावर बसलेला मी,
आणि माझ्यासोबत फक्त तु...

हे एकांता,
कदाचीत आपली सर्वांचीच काहीतरी जुनी वीण असावी,
नाहीतरी उगाच का? या अशा संध्येला
मला तुझी ओढ, तुला किनार्याची,
किनार्याला लाटांची, आणि लाटानांही या संध्येची...
(एकांत-संध्येच्या छटा©)
"मुक्त कलंदर©."(प्रदिप काळे)
________________________________________________________

©"All Rights reserved"
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

अटळ सत्य

मृत्यु ... एक सत्य अटळ आणि अंतीम
तरीही जगतोच आम्ही आमुच्याच धुंदीत
अमरत्वाचा वर मिळाल्याच्या एेटीत...
काळालाही केलं आहे  बंदी,
सुंदर अंकानी मढवलेल्या पारदर्शी काचेच्या पेटीत
पण विसरतो हेच की धावतोय तोही अविरत भुतकाळाला मागे टाकीत...
कल्पनांचे वारु उधळताहेत,
भविष्याच्या क्षितीजापार चौखुर आपुल्याच धुंदीत
पण वाट पाहतेय मधेच एक सत्य पुसत नाही जे त्या खुरांच्याही धुळीत...

-प्रदिप काळे (मुक्त कलंदर©)
पंढरपुर.
९६६५९८०६०४
_________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

निळावंती : एक न उलगडलेले रहस्य

(डिस्क्लेमर : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्यामुळे अंधश्रध्दा वगैरे मुद्यावर वाद घालु नये. या लेखाद्वारे फक्त समाजामध्ये चर्चिल्या जाणार्या काही गुढ व रहस्यमयी विषयासंबंधी लिहले  त्या विषयांमध्ये कुणी किती खोल जायचे व कुणी किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.  अंधश्रध्दा वगैरे विषयांवर वादविवाद करणार्यांनी स्वत:च्या जबाबदारीवरती हा लेख वाचणे.)
         निळावंती हे नाव अनेकांनी अगोदर खुपदा ऐकलं असेल त्यातील काहींनी दंतकथा म्हणुन सोडुनही दिलं असेल. तर काहींसाठी विषय नवीनचं असेल.पण रहस्य, गुढशास्त्र यांची आवड असणार्यांना  "निळावंती" हे नाव काही नवीन नाही.
याची सुरवात कधी झाली हे सांगु शकत नाही, मात्र खुप पुर्वी पासुन मौखिक स्वरुपात या ग्रंथा विषयीची माहीती चालत आली, की हा ग्रंथ वाचल्या नंतर वाचकाला सर्व पशु-पक्षी,किटक व सर्व जीवांची ज्यांचा उल्लेख ८४लक्ष योनींमधे येतो त्या सर्वांची भाषा समजते असं म्हटलं जाते.
या ग्रंथाविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत तर प्रथमत: ते पाहु.
काहीजणांना निळावंती हा ग्रंथ थोर गणिततज्ञ भास्कराचार्यांनी लिहला असं वाटतं पण तसं नाही कारण भास्कराचार्यांचा ग्रंथ "निळावंती" नसुन "लिलावती" हा आहे. हा गणितविषयक  ग्रंथ असुन भास्कराचार्यांची मुलगी लिलावती च्या नावावरुन आहे. हा ग्रंथ भास्कराचार्य लिखित "सिध्दांत शिरोमणी" या ग्रंथाचा एक भाग आहे.( या लिलावती ग्रंथाची व भास्कराचार्यांच्या इतर लेखनाविषयी विकीपिडीया वरती बरीच माहीती उपलब्ध आहे.) परंतु याच नावाची कुणी दुसरी व्यक्ती असु शकेल हेही नाकारता येत नाही. फक्त सांगण्याचा मुद्दा हाच की "निळावंती" व "लिलावती" हे दोन वेगळे ग्रंथ आहेत.
            अजुन एक निळावंती या नावाचा वन्यजीव अभ्यासक व लेखक  "मारुती चित्तमपल्ली" यांचाही एक कथासंग्रह आहे. याच्याही बाबतीत बहुतेक जण गफलत करतात. पण हादेखिल तो ग्रंथ नाही.
तर मुळ ग्रंथ "निळावंती" हा वेगळा आहे. काहींना हा ग्रंथ अघोरी साधनेचा ग्रंथ वाटतो, काळ्या शक्तींशी निगडित वाटतो.पण तसे पाहता निळावंती हा ग्रंथ अघोरी वगैरे वाटत नाही. या ग्रंथाच्या वाचनाने पशु-पक्षांची भाषा समजते. या ग्रंथाच्या अर्धवट वाचनाने वेड लागतं, मृत्यु येतो असंही म्हणतात. तसं पाहिलतर अर्धवट ज्ञान हे कधीही धोकादायकच असतं. कदाचीत ग्रंथाच्या शेवटी त्या शक्तीला कंट्रोल करण्याचे रहस्य असेल. जसं आजच्या काळात कुठल्याही नवीन वस्तुबरोबर user manual येत तसच काहीसं.
ज्या निळावंतीच्या नावावरुन या ग्रंथाला हे नाव मिळाले तिची कथा जी मी कुठेतरी वाचली होती व जी आजकाल जाला(Internet) वरती फिरते आहे ती थोडक्यात अशी की,
              "निळावंती ही धनवंताची कन्या. तिला पशु-पक्षांची भाषा ज्ञात होती. ती त्यांच्याशी बोलत असे, ते पशु-पक्षी तिला जगात घडणार्या वेगवेगळ्या घटणांविषयी व त्याबरोबरच गुप्तधनाची माहीती सांगत. लग्नानंतर एेके दिवशी मध्यरात्री तिला कोल्हेकुई एेकु आली, त्यावरुन तिला समजले की नदीतुन एक प्रेत वाहत येत आहे. त्या प्रेताच्या कमरेला अमुल्य मणी बांधलेला आहे. ते एेकल्यावर ती तिकडे निघाली. अशा अमानवी शक्ती जवळ असताना त्यासंबंधी समाजामधे उलट-सुलट चर्चा ही होणारच. आणि हीच चर्चा तिच्या पतीच्याही कानी आली असल्यामुळे ती काय करते हे पाहयला तिचा पती ही गुपचुप तिच्या पाठी निघाला. निळावंतीने ते प्रेत बाहेर घेतले व ती कमरेला गुंडाळलेला मणी काढु लागली, पण तो गाठींमध्या बांधला असल्याने, तिला त्या गाठी सुटेनात म्हणुन ती दाताने गाठ सोडु लागली, हे तिच्या नवर्याने पाहीलं व त्याला वाटलं ती प्रेत खातेय वगैरे आणि त्यामुळे ती कुणीतरी चेटकिण वगैरे आहे या कल्पनेने त्याने तिला सोडुन दिले."
                तर अशी ही निळावंती ची थोडक्यात कथा. (माझ्या माहीती प्रमाणे "नवरंग प्रकाशन, कोल्हापुर" यांनी निळावंती याच नावाने एक पुस्तक प्रकाशीत केले ज्यामधे शाहीर हैबतीबुवा पुसेसावळीकर यांनी लिहलेलं निळावंती आख्याण आहे.कदाचित त्यामधुन जास्त माहीती मिळु शकेल. )
            ही निळावंती ची कथा पुढे लोकशाहीरांनी, पिंगळा ज्योतीषांनी आपल्या कवणातुन जिवंत ठेवली. आम्ही लहान असताना पहाटे पिंगळा ज्योतीष घरोघरी भिक्षा मागण्यास यायचे. आजकाल ते बंद झालेत . त्यांच्या हातात लहान डमरु सारखं एक वाद्य असायचे ज्याचा आवाज पिंगळा पक्षाच्या आवाजा सारखा यायचा.ते काही गीतं गायचे. पण लहान असल्यानं त्या गाण्यापेक्षा त्यांच्या वेषभुषेचं आणि त्या वाद्याच कुतुहल असायचं. त्या मुळे त्यावेळी त्या गीतांकडं कधी लक्षच गेलं नाही. नंतर अस एेकल की या पिंगळा ज्योतीषांनी निळावंती हा ग्रंथ वाचला आहे व त्यांना पशु-पक्षांची भाषा ज्ञात असते. पण हे समजेपर्यंत ते ज्योतीष यायचे बंदही झाल होते, त्यामुळे खरं काय हे त्यांनाच माहीत. पण जसं कळायला लागलं तसं त्या ज्योतीषांचं येणंही बंद झालं आणि विचारायचेही राहुन गेलं. त्यानंतर खुप ठिकाणी हा ग्रंथ शोधण्याचा प्रयत्न केला पण हा ग्रंथ मिळालाच नाही.
फेसबुक वरती या ग्रंथाच्या नावाची पेजेस ही कुणी तरी बनवली आहेत तिथुनही काही जास्त माहीती भेटत नाही.तिथेही कुणी चित्तमपल्लींच पुस्तक दाखवतं तर कुणी नवरंग प्रकाशनचं. प्रत्येकाकडे फक्त प्राथमिक माहीतच उपलब्ध आहे. जालावरतीही काहीजणांनी याच्याविषयी लिहले आहे.( अधिक माहीती साठी गुगल करुन पहा). मागे एकदा दैनिक सकाळ मधे दर रविवारी प्रकाशित होणार्या सप्तरंग या पुरवणीत उत्तम कांबळे यांचा या विषयीचा एक लेखही आला होता.
  या ग्रंथाच्या काही प्रती अजुनही काही लोकांकडे आहेत अस सांगीतलं जातं. काहीजण आपल्याकडे त्याची हस्तलिखित असल्याचाही दावा करतात. पण ते देण्यास लोकांसमोर आणण्यास मात्र नकारच येतो. त्यामुळे याची सत्यता पडताळता येत नाही.
निळावंती ची कथा ही मौखिक असल्यामुळे पिढ्या दर पिढ्या ती चालत आली , ती खुलवुन सांगण्यामुळे त्या मधे काही नवीन गोष्टीही मिसळल्या गेल्या असतील, काही भाग वगळलाही असेल. पण गुढ वाढतच गेलं आणि कुतुहलही.
    या ग्रंथाविषयी देखिल खुप कमी माहीती उपलब्ध आहे.प्रत्येकाची आपली एक वेगळीच कथा. जितक्या व्यक्ती तितक्या कथा असचं म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच या ग्रंथा भोवती गुढतेचं वलय निर्माण झालं. आणि लोकांचं कुतुहलही वाढत गेलं.
     याच्या विषयी काही माहीती सांगीतली जाते ती अशी की, हा ग्रंथ एकांतात वाचावा लागतो. संस्कृत भाषेत असलेल्या या ग्रंथात प्रत्येक प्राणी-पक्षी व जीव यासाठी या ग्रंथात वेगळा मंत्र आहे. त्या मंत्राच्या उच्चारणा बरोबर तो तो प्राणी किंवा पक्षी त्या ठिकाणी उपस्थित राहतो.कांहीच्या मते यामधे राक्षस,भुत,पिशाच यांचे ही मंत्र आहेत.(पौरणिक ग्रंथांनुसार पशु-पक्षी ,मानव यांप्रमाणे राक्षस, भुत, पिशाच हे सुध्दा ८४लक्ष योनी मधे येतात. या ८४लक्ष योनींचा उल्लेख पौराणिक ग्रंथात येतो.) वाचना दरम्यान काही शक्ती वाचनात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. त्या वाचकाला काही इजा करत नाहीत, फक्त घाबरवतात, आणि काहीजण इथेच घाबरतात व वाचन अर्धवट सोडतात. आणि त्या शक्ती नियंत्रित न करता आल्यामुळे संभवत: वेड लागणे वगैरे गोष्टी घडतात.पण ही सर्व एेकिव माहीती आहे. कदाचित मुळ ग्रंथ अजुनही वेगळा असु शकतो.
जसं की सहदेव-भाडळी या ग्रंथात पशु-पक्षांच्या हालचालीवरुन, आवाजावरुन शुभाशुभ शकुणांची, ऋतुमानाची भाकीतं केली आहेत तसही काही असु शकतं.
पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरुपात आल्यामुळे त्याच्यात चमत्कारीक भाग मिसळला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्या प्रमाणे आपल्या काही शास्त्रांमधे अनेक वैज्ञानिक प्रयोगांची वर्णने आहेत. जसं की महर्षी भारद्वाज लिखित वैमानिक शास्त्र, यंत्रसर्वस्वम् हे ग्रंथ. फक्त ती भाषा व त्या भाषेतील त्या काळातील काही शब्दांमुळे म्हणा किंवा त्या गोष्टींचं विशेषणे वापरुन जे काही अलंकारीकरित्या चमत्कारीक वर्णन केलेल असतं त्यामुळे आपण ते समजु शकत नाही.( पुढील लिंक वरती अगस्त्य संहीतेतील अशाच एका प्रयोगाविषयी एक लेख वाचु शकता.Click Here ) परंतु चमत्कारांचा विषय आला की मग संपलच.इथे काही लोकांच ठरलेल वाक्य " अरे कुठल्या काळात जगतोयसं, २१ वे शतक चालु आहे, या सर्व भाकडकथा आहेत" आणि विषय तिथेचं संपतो. त्यांचीही यात काही चुक नसावी कारण मागील काळात अनेकांनी चमत्काराच्या नावाखालि जी काही कृत्य केली त्यामुळेही हे असु शकतं.
पण कसं आहे चमत्कारा कडे चमत्काराच्या नजरेनेच बघाव असंही काही नाही. कदाचित त्यातही काहीतरी वेगळा अर्थही असु शकतो. नाही पण आपल्याकडे तेवढा वेळचं कुठे असतो. मग कालांतराने कुणितरी काहीतरी शोध लावला की म्हणायचं की " अरे, आमच्या पौराणिक साहीत्यांमधे तर याचा उल्लेख अगोदरचं आहे." आणि नंतर वाद करण्यासाठी मात्र आपल्याकडे भरपुर वेळ.
परंतु जर आपल्यालाच आपले ज्ञान, साहीत्य, संस्कृती आत्मसात करता व जपता आली नाही तर त्यामधे त्या शोध लावणाराची काहीच चुकी नाही.
आपण आपल्या मुळ विषयाकडे वळु, तर एवढंच म्हणायचं की निळावंती मध्येही अस काहीतरी असु शकतं. पण त्यासाठी तो ग्रंथ तरी मिळायला हवा ना. खरेतर या ग्रंथाच्या अस्तित्वा विषयी देखिल शंका आहेच. पण जस वर सांगीतलं तस काही काही लोकांकडे हा ग्रंथ असल्याचेही दावे आहेत. आणि बहुतेकांनी याच्याविषयी एेकले आहे त्यामुळे अस्तित्व नाकारु ही शकतं नाही. काहींनी आपल्या पुर्वजांकडे किंवा नातेवाईकांकडे हा ग्रंथ होता पण त्यांनी तो कुठेतरी ठेवला किंवा जलार्पन केला असंही सांगतात. हा ग्रंथ प्रत्यक्ष पाहीलेला व वाचलेला मलातरी अजुन भेटला नाही. या ग्रंथाविषयी कितीही माहीती गोळा केली तरीही त्या ग्रंथापासुन आपण तेवढेच दुर असल्याचं जाणवते. मागे फेसबुक वरती एका पेजवरती कुणीतरी एक फोटो अपलोड केला होता, ज्यामधे एका तांब्याच्या पत्र्यावर निळावंती हे नाव कोरलं होत व त्या खाली ईसवी सन १६०९ आणि लेखक म्हणुन भास्कर भट्ट व त्यापुढे भाषा संस्कृत असं कोरलं होतं. पण दुसरा कुठलाही फोटो नव्हता. त्याने बाकी फोटो अपलोड केले नाहीत. त्यामळे तो खरचं निळावंती ग्रंथ होता का हे कळु शकलं नाही. या ग्रंथाविषयी चे बाकी लोकांचे तर्क-वितर्क जालावरती व सोशल साईट्स वरती भरपुर वाचायला मिळतील. 
    या पुस्तकाच्या गुढतेमुळ म्हणा किवा लोकांनी या विद्येच्या केलेल्या वापरामुळे म्हणा या ग्रंथाला काळी किनार लाभली. काहींनी याला काळ्या जादुचा ग्रंथ असंही म्हटलं आहे, अघोर साधनेचाही ग्रंथ म्हटलं.काही लोकांनी हा ग्रंथ मिळवण्यासाठी अघोरी प्रकार केलेही असतील. या ग्रंथाच्या नावावर अनेकांना लोकांना लुबाडलेही. गुप्तधनाच्या नावाखाली अमानुष कृत्येही केली.
पण त्यामुळे तो ग्रंथ ते शास्त्र किंवा ती विद्या वाईट ठरत नाही ना. कारण  प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात एक चांगली दुसरी वाईट. आपण त्या गोष्टीचा कसा उपयोग करु त्यावर ते अवलंबुन असतं.  आता आजच्या काळातील उदाहरण घ्यायचं झालं तर अणु(Atom) चा शोध लागला. त्यामुळे विज्ञानात क्रांतीही झाली पण त्यातुनच अणुबाॅम्ब तयार केला. आज अणुचं नाव जरी निघालं तर प्रथम अणुबॉम्बच आठवतो ना. तसचं काहीस या ग्रंथाविषयी झालं असेल.याच्या विषयीच नाही तर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत हेच घडतं आणि चांगल्या गोष्टीही बदनाम होतात.
अनेकांनी या ग्रंथाच्या शोधात आपलं आयुष्य खर्ची घातलं. मागे काही लोकांविषयी हा ग्रंथ वाचल्याच्या अफवाही होत्या. शेवटी कुणी किती खोल जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
हा ग्रंथ अस्तित्वात असेल का नाही  हे काळालाच ठाउक.  कारण निळावंती ची कथा खरी असेल आणि हा ग्रंथ जर अस्तित्वात असेल तर याचा एकमेव साक्षीदार काळचं आहे.कदाचित काळाच्या या चक्रात इतर अनेक अमुल्य साहीत्याप्रमाणे हेदेखिल हरवलं असण्याची शक्यता आहे.
परंतु जो पर्यंत माणसाच्या मनात कुतुहल आहे, नवीन गोष्टी जाणुन घेण्याची जिज्ञासा आहे आणि जो पर्यंत ही कथा जिवंत आहे, तोपर्यंत पिढ्यान् पिढ्या हा शोध असाच हा चालु राहणार. 
प्रदिप काळे (मुक्त कलंदर)
पंढरपुर 
९६६५९८०६०४
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे सुद्धा अवश्य वाचा सहदेव भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
__________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

साथ दे तु मला...

साथ दे तु मला, नयनातील आसवांपरी
सुख-दु:खातील त्या नाजुक टपोर्या थेंबापरी

गीत माझ्या मनातले मी, कोरले या ह्रदयावरी
जपुन ठेव तु ते इतुके , तुझ्या डोळ्यातील स्वप्नापरी

जपल्या मी आठवणी, इतुक्या माझ्या मनी
जपशील का तुही त्या, तुझ्या ओठातील स्मितापरी

रात स्वप्नांचीही आता, नशीबी माझ्या न राहीली
चांदण्या मोजु बघता, त्यांस लपवीले काळ्या नभांनी

भेट आता एकदाची, उन्हातल्या सावलीपरी
गीत गाऊ दोघे मिळुनी, कोरले जे  ह्रदयावरी

-प्रदिप काळे(मुक्त कलंदर)
______________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

आज तु आठवलीस...


आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले
कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले.

खंत यासाठी की,
मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी
गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी
भीती नव्हती बोलण्याची,
हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची
भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही

अन् आनंदाचे यासाठी की,
आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस
अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस
ताल बिघडले मनाचे,
हो तालचं बिघडले मनाचे
कारण तु सुरचं घेऊन गेलीस

आता आजही शोधत असतो फक्त तुला,
कधी मोगर्याच्या गंधात
कधी फुलांच्या पाकळ्यात
कधी सागराच्या लाटेत
कधी चंद्राच्या चांदण्यात
तर कधी तार्यांच्या अंगणात

अन तु भेटतेसही मला
कधी एकांताच्या कोन्यात
कधी विरहाच्या तळात
कधी मौनाच्या शब्दात
कधी सुरांच्या मैफलीत
तर कधी या कवितेच्या पानात.

आज फक्त तुला आठवतो
कारण वेळ माझी केव्हाच गेली
पण वाट पाहतो तुझी आजही
कारण तुझी वेळ अजुन नाही गेली

कधीतरी तुला कळेलही
सुर माझा गवसेलही
शब्द माझा एेकशीलही
मागे वळुन पाहशील ही

मी उभा असेन तिथेच
जिथे तुला पाहीले
अन् शब्द माझ्या कवितेतील
जिथे पुर्वी हरवले

मी असेन तिथेच
वाट पाहत फक्त तुझी.

-मुक्त कलंदर (प्रदिप काळे).
_____________________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

शांत समय अन्...

शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती
न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती

धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी
अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई,
माझ्या कविता आणिक गाणी

शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट
उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट

ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ
पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ

दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला
अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला

असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती
बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती
                                    
 - मुक्त कलंदर© (प्रदिप काळे).
____________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©


उदास क्षण, उदास मन

संध्याकाळची वेळ होती,
मन एकदम उदास होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं

अशा या क्षणी काय करावे, कुठे जावे,
काही समजत नव्हते
मन उदासवाणे इकडुन तिकडे, फक्त भटकत होतं

विचारांच्या गर्दी पासुन दुर,
शांत ठिकाणी हरवत होतं
जणु मनाच्या या नगरीत , सुतकच पडलं होतं

जसजसा दिवस सरत होता,
तस तस मन अजुनच भरकटत होतं
ना बोलण्यात, ना एेकण्यात, कशातच मन लागत नव्हतं

विचारांपासुन दुर जावुन,
जणु विचार करणच सोडल होतं
का नि कशासाठी, काही समजत नव्हत

ना राग येत होता ना हसणं,
मन एकदम निश्चल दगडा प्रमाणे भासत होत
जगापासुन दुर कुठेतरी, आपल्याच नादात होतं

रात्री गडद अंधारात,
हळु हळु बुडुन जात होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं.

 -मुक्त कलंदर© (प्रदिप काळे).
_________________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected